दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बंगालमधील राजकारणात भाजपला रोजच नवनवे झटके बसत आहेत. आताही भाजपला आणखी एक जोरदार झटका बसला आहे. पक्षाचे लोकसभा खासदार अर्जुन सिंह यांचे तीन सहकारी रविवारी सत्ताधारी टीएमसीमध्ये दाखल झाले. भाटपारा नगरपालिकेचे अध्यक्ष सौरव सिंह आणि माजी आमदार सुनील सिंह यांचाही यात सहभाग आहे. सौरव सिंग यांना भाजपने निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.
सुनील सिंह नोआपारा येथून आमदार राहिले आहेत. नोआपारा येथील नगरपालिका निवडणुकीतही त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. सुनील सिंग यांच्यासह त्यांचा मुलगा आदित्य सिंग आणि अर्जुन सिंग यांचा पुतण्या सौरव सिंग यांनी अर्ज मागे घेतला. नंतर हे तिघेही टीएमसीमध्ये दाखल झाले.
एकीकडे भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते तृणमूलमध्ये सामील झाले आहेत तर दुसरीकडे टीएमसीमधील अंतर्गत कलहाच्या बातम्याही समोर येत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यातील संघर्षाच्या बातम्याही चर्चेत आहेत. या वादानंतर ममता बॅनर्जी यांनी 20 सदस्यीय राष्ट्रीय समितीची घोषणा केली आहे. पक्षातील जुन्या-नव्या नेत्यांमधील संघर्ष रोखण्यासाठी ही समिती काम करेल.
समितीच्या पदाधिकाऱ्यांची नावे ममता बॅनर्जी नंतर जाहीर करतील आणि त्यानंतर ही यादी निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल, असे सांगण्यात आले. अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक तरुण नेते पक्षात एक व्यक्ती एक पदाचा पुरस्कार करतात, तर जुन्या नेत्यांनी याला अनुशासनहीनता म्हटले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीआधी अनेक नेते भाजपमध्ये आले होते. निवडणुकीनंतर मात्र अनेकांनी पक्ष सोडला आहे. पक्षांतर अजूनही सुरुच आहे. यामुळे भाजपसाठी अडचणी वाढल्या आहेत. आता तर पक्षाचे आमदार सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे पक्षांतर थांबवणे हे एक मोठे आव्हान भाजपसमोर उभे राहिले आहे.
बंगाल, राजस्थाननंतर आणखी एका राज्यात भाजपला धक्का; काँग्रेसने मिळवला दणदणीत विजय