नवी दिल्ली – रस्ते अपघातात गंभीर जखमी लोकांच्या मदतीसाठी सहसा कोणी धजावत नाही. अनेकांना पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याची भीती वाटत असते. त्यामुळे काही अपघातस्थळाचे मोबाईलमध्ये शुटिंग काढत बसतात, तर काही जण जखमीबाबत हळहळ व्यक्त करीत आपल्या वाटेला लागतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकदा जखमींना आपला जीव गमावावा लागतो.
ही बाब लक्षात घेऊन अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, यासाठी मोदी सरकारने एक विशेष योजना आणली आहे. ती म्हणजे, अपघातानंतर एका तासाच्या आत जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचविणाऱ्यांसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र पाठविले आहे. त्यात ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असणार असल्याचे म्हटले आहे.
अपघातातील जखमींना प्रामाणिकपणे मदत करणाऱ्यांना बक्षीस देण्याच्या या योजनेसंदर्भात मंत्रालयाने सोमवारी (ता. 4) एक नियमावलीही जारी केली. आणीबाणीच्या परिस्थितीत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा हेतू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
या योजनेंतर्गत, मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख बक्षिसांसह एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर सर्वात प्रामाणिकपणे सहकार्य करणाऱ्या 10 लाेकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीही गडगडली, लेटेस्ट किंमती जाणून घेण्यासाठी वाचा..
बाब्बो.. त्या प्रकरणातही आलेय सचिन तेंडुलकरांचे नाव..! पहा नेमके काय म्हटलेय बातमीत