भाजपाच्या ‘त्या’ राष्ट्रीय नेत्याचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा…म्हणाला असं काही…
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याने शेतकरी आंदोलकांच्या मागणीला पाठींबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुजफ्फरनगर : तीन कृषी कायदे लागू झाल्यानंतर देशात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनाला तब्बल 10 महिने पुर्ण होत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मागणी असलेले तीनही कृषी कायदे मागे न घेण्याची भुमिका घेतली जात आहे. त्यातच सध्या शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकेत केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी महापंचायतचे आयोजन करत आहेत. त्यातच भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याने शेतकरी आंदोलकांच्या मागणीला पाठींबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर येथे शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी किसान पंचायतचे आयोजन केले होते. तर या किसान पंचायतसाठी लाखो शेतकरी उपस्थित होते. किसान पंचायततर्फे शेतकरी नेते राकेश टिकेत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी भाजपाचे महत्वाचे नेते असलेले वरूण गांधी यांनी ट्वीट करून शेतकरी आंदोलकांना पाठींबा देत असल्याचे ट्वीट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
वरूण गांधी हे भाजपा नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या मेनका गांधी यांचे सुपुत्र तर इंदिरा गांधी यांचे नातू आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलकांना पाठींबा देतांना ट्वीटरवर म्हटले की, मुजफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकजूट झालेले आहेत. ते आपलेच रक्त आहे. आपण त्यांच्यासोबत सन्मानजनक पध्दतीने जोडले जायला हवे. त्यांचे दुःख समजून घ्यायला हवे. तसेच त्यांच्या नजरेतून पाहून जमीनीशी जोडून राहण्यासाठी त्यांच्या सोबत काम करायला हवे, असं मत वरूण गांधी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पातळीवरील भाजपाच्या बड्या नेत्याने शेतकरी आंदोलनाचं केलेलं समर्थन देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. तर यावर भाजपा काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.