दिल्ली : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. एकीकडे राजपक्षे सरकारच्या अडचणी वाढत असताना आता श्रीलंकेतील जनतेला रस्त्यावर उतरावे लागले आहे. अशा परिस्थितीत भारत श्रीलंकेला मदत करत आहे. त्यामुळे श्रीलंकेचे माजी केंद्रीय मंत्री आणि श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी श्रीलंकेला मदत केल्याबद्दल मोदींचे आभार तर मानलेच पण भारताला श्रीलंकेचा मोठा भाऊ म्हणूनही वर्णन केले.
रणतुंगा म्हणाले की, जाफना विमानतळ सुरू करण्यासाठी भारताने मदत केली आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींनी सहकार्य केले. भारत आमच्यासाठी मोठा भाऊ आहे. भारताला आमच्या गरजा समजतात. या कारणामुळे भारताने पेट्रोल-औषध यांसारख्या गोष्टींचीही मदत केली आहे, येत्या काळात या सर्व गोष्टींची कमतरता भासू शकते. सध्याच्या राजपक्षे सरकारवर टीका करताना रणतुंगा म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये असे काही लोक आहेत ज्यांना समाजात फूट पाडायची आहे. श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र समस्या आहे.
त्याचबरोबर श्रीलंकेचे सरकार अहंकारी असल्यासारखे वागत असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले की, आंदोलनांमध्ये सामान्य जनता फक्त मूलभूत गोष्टींचीच मागणी करत आहे, यामध्ये दूध, गॅस, तांदूळ, पेट्रोल यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. मात्र, येथे होत असलेल्या हिंसाचाराशी मी सहमत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, श्रीलंकेत, आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्याची मागणी करत मोठ्या संख्येने लोक सरकारचा विरोध करत आहेत. श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅस यांची देशात प्रचंड टंचाई आहे. तासनतास वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे श्रीलंका सरकारमध्येही खळबळ उडाली आहे.
चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची