दिल्ली : शेजारील देश श्रीलंकेत आर्थिक संकट असताना औषधांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. मंगळवारी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रुग्णांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधीही फेब्रुवारी महिन्यात सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केली होती. औषधांबरोबरच श्रीलंकेतील नागरिक विजेसारख्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत.
वृत्तसंस्थेने डेली मिररच्या हवाल्याने म्हटले आहे की, देशाच्या सरकारी वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (जीएमओए) आपत्कालीन समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. बैठकीत आपत्कालीन कायद्याची अंमलबजावणी आणि औषधांची तीव्र टंचाई याबाबत चर्चा करण्यात आली. सचिव डॉ. शनेल फर्नांडो यांनी सांगितले की, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपत्कालीन आरोग्य स्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, बैठकी दरम्यान जीएमओएने उघड केले की सरकारच्या खराब व्यवस्थापनामुळे देशात औषधांची तीव्र कमतरता असेल. एएनआयने श्रीलंकन वृत्तपत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, सध्याचे आर्थिक संकट असेच चालू राहिल्यास औषधांची टंचाई अत्यंत गंभीर स्थितीला पोहोचेल. बिघडलेली परिस्थिती पाहता सरकारने अलीकडे कर्फ्यूही जाहीर केला होता. सरकारचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.
डॉ. फर्नांडो म्हणाले, ‘आरोग्य सेवा अत्यावश्यक म्हणून घोषित केल्यानंतर सरकारने देशात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुनिश्चित करायला हवा होता.’ त्यामुळे आपत्कालीन औषधांच्या टंचाईची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने घ्यावी, असे ते म्हणाले. आर्थिक संकटाचा सामना करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांविरोधात जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. कोलंबोमध्ये निदर्शने सुरू झाल्यानंतर श्रीलंकेने तीन दिवसांचा कर्फ्यू जाहीर केला.
चिन्यांचा कुटील डाव उघड : कर्जात अडकलेल्या `त्या` देशाला भारताने दिली इतकी अब्ज डॉलर मदत