मुंबई – भारत आणि श्रीलंका (IND vs Sri Lanka) यांच्यात 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची T20 मालिका (T20 Series) सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच निवड करण्यात येणार आहे. टीम सिलेक्शनपूर्वी एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चार महिन्यांनंतर पुनरागमन करू शकतो.
जडेजा नोव्हेंबर 2021 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेपासूनही तो दूर राहिला आहे. जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत भाग घेतला होता. आता तो टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याला टी-20 सामन्यांच्या मालिकेतही खेळण्याची संधी मिळू शकते.
बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फिट होत असलेला जडेजा 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या T20 सामन्यापूर्वी लखनौला पोहोचला आहे. त्याला लखनौमधील हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे समजते. कोविड चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर तो टी-20 संघाचा भाग होऊ शकतो.
जडेजासोबत जसप्रीत बुमराहचेही पुनरागमन अपेक्षित आहे. बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही खेळू शकला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 26 जानेवारीला सांगितले की, मोहम्मद शमी आणि जडेजासोबत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
संघ निवडीदरम्यान कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणाही होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. त्याच्या माघारीनंतर कसोटी संघाच्या कर्णधाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. एकदिवसीय आणि टी-20 नंतर आता रोहित शर्माकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवले जाईल, असे मानले जात आहे.