मुंबई- विराट कोहलीने ( Virat Kohli) कसोटीचे कर्णधारपद अचानक सोडल्यानंतर त्याच्या जगभरातील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी देखील विराटच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तीन महिन्यांतच त्याने T20 आणि ODI यासह सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार (Pakistan ex captain) शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) विराटवर प्रतिक्रिया दिली आहे.
आफ्रिदीने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की त्याचा निर्णय योग्य आहे. विराटने भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि आपल्या संघाचे नेतृत्वही केले आहे. मला वाटते की त्याने एक चांगला निर्णय घेतला आहे. क्रिकेट करिअरमध्ये एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्ही दडपण हाताळू शकत नाही. त्यामुळे कामगिरीवरही परिणाम होतो. त्यामुळे मला वाटते की त्याने दीर्घकाळ टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे आणि त्याचा विक्रम चांगला आहे. आता तो फलंदाज म्हणून क्रिकेटचा आनंद घेऊ शकणार आहे.
विराटने 68 कसोटीत भारताचे नेतृत्व केले. यापैकी टीम इंडियाने 40 कसोटी जिंकल्या आहेत आणि 17 गमावल्या आहेत. 11 कसोटी अनिर्णित राहिल्या. त्याने धोनीच्या कर्णधारपदाचे सर्वाधिक कसोटी आणि सर्वाधिक विजयाचे दोन्ही विक्रम मोडीत काढले आहे. धोनीने 60 कसोटींमध्ये कर्णधारपद भूषवले असून 27 जिंकल्या आहेत. टीम इंडियाला 18 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले तर 15 सामने अनिर्णित राहिले.
2014 मध्ये कोहलीने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा टीम इंडियाचा कसोटी क्रमवारीत सातवा क्रमांक होता. त्याने आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कसोटीत नंबर-1 बनवले. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी 2016 आणि ऑगस्ट 2016 या कालावधीत टीम इंडियाने ही रँक मिळवली. त्यानंतर ऑक्टोबर 2016 ते एप्रिल 2020 पर्यंत संघ पहिल्या क्रमांकावर होता. आणि आता देखील पाहिल्या क्रमांकावर आहे