नवी दिल्ली : टी- 20 विश्वचषक 2021 मध्ये अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत. प्रत्येक संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतालाही आता न्यूझीलंडविरुद्ध विजय आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आता कोणती टीम यंदाच्या टी- 20 विश्वचषकात विजेतेपद पटकावणार आहे, याचा अंदाज वर्तवला आहे.
सोशल मीडियावर एका चाहत्याने त्याला विचारलं की, या वर्षी कोणती टीम टी- 20 विश्वचषक जिंकणार? ज्याचं उत्तर एका शोच्या एपिसोडमध्ये देताना सेहवाग म्हणाला, भारतच हा विश्वचषक जिंकेल. तो म्हणाला, माझ्या मते, केवळ टीम इंडियाच या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकेल.
पाकिस्तान टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. एवढंच नाही तर पुढच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला 5 विकेट्स राखत हरवलं. उपांत्य फेरीत पोहोचणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. अंतिम फेरीत भारत- पाकिस्तान अशी पुन्हा लढत होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
पाकिस्तानशिवाय भारताला इंग्लंडकडूनही मोठा धोका आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंमध्येही आत्मविश्वास आहे. तसं, भारतीय संघाने याआधीच सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. परंतु तरीही इंग्लंड संघाला हलक्यात घेता येणार नाही.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड मॅचमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला. टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारतावर पहिला विजय आहे. टॉस हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय टीमची सुरुवात चांगली झाली नव्हती.