पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रीया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सारसबाग जवळील सावरकर पुतळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘काळी टोपी हटाव’ असा हल्लाबोल करत छत्रपती महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी, काळी टोपी काळे मन हेच भाजपचे अंतरमन, भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो, सुधांशु त्रिवेदींचा धिक्कार असो,अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना याबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु, विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर तसेच संतापजनक बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज; तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून ते त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा राबवित आहेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली. सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचा निषेध करीत आहे, असे प्रदीप देशमुख यांनी सांगितले.
must read