मुंबई : एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. भेटी दरम्यान काय चर्चा झाली याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. हि सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तर आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांना यावेळी भाजपाशी युती करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी हा शक्यता फेटाळून लावली. आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. तसंच जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे असं सांगत शिंदे गटाशी युती करण्याचा दावाही फेटाळून लावला.
“आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजरचनेसंबंधी आमचं भांडण आहे. जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपासोबत जाण्याचा संबंध नाही. जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. “नाना पटोलेंनी काँग्रेस एकटं लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहात की आमच्याशी प्रत्येकजण वेगळं बोलणार आहे हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. “२० तारखेचा पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी आधीच ठरला होता. प्रबोधनकार यांच्याशी संबंधित नवं पोर्टल आहे. प्रबोधनकार आणि बाबासाहेब यांचे संबंध जवळचे असल्याने त्यांनी या पोर्टलच्या उद्धाटनास येण्याची विनंती केली होती. त्यासाठी मी होकार दिला असून, हजर राहणार आहे. पण महाविकास आघाडीचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं पुढे काय होईल असं दिसत नाही,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. “काँग्रेसचे काही नेते भेटून गेले होते, त्यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेशी राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांचे काही नेते भेटले हे खरं आहे. पण ही भेट फक्त २० तारखेच्या कार्यक्रमासंबंधी होती,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
must read