दिल्ली : मोदी सरकारने आता आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या निमित्ताने सरकार शेतकऱ्यांना एक मोठी भेट देणार आहेत. आज देशातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Farmer Bank Account) 21,000 कोटी रुपये हस्तांतरित होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शिमला (Shimla) येथे होणाऱ्या गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 11 व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करतील.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करण्याबरोबरच पंतप्रधान यावेळी पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1.80 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात म्हणजे वर्षातून तीनदा, प्रत्येकी दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. याआधी 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते.
मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिमला येथे होणाऱ्या या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि देशभरातील विविध राज्यांच्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये गरीब कल्याण संमेलनही आयोजित केले जात असून त्यात केंद्र सरकारचे मंत्री आणि इतर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेशी थेट संवाद साधून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत अभिप्राय जाणून घेतील.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदाच्या पावसाबाबतचा अंदाज आला समोर…!