दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी नव्या वर्षात एक खुशखबर मिळाली आहे. आता प्रवाशांना त्यांची काही महत्वाची कामे रेल्वे स्टेशनवरुनही करता येतील. रेल्वे मंत्रालयाकडून यासाठी नियोजन करण्यात आले असून लवकरच 200 रेल्वे स्टेशनवर ही सुविधा सुरू होणार आहे. येथील प्रवासी लवकरच त्यांचे मोबाइल रिचार्ज करू शकतील. तसेच वीज बिलही भरता येतील. आधारकार्ड आणि पॅनकार्डचे अर्जही भरता येतील. इतकेच नाही तर कराचाही भरणा करता येईल. देशातील दोन रेल्वे स्टेशनवर प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
यासाठी RailTel आता RailWire Sathi Kiosk स्थापन करणार आहे. ईशान्य रेल्वेच्या दोन रेल्वे स्टेशनवर ही सुविधा सुरू झाली आहे. ही सुविधा लवकरच गोरखपूरसह अन्य प्रमुख रेल्वे स्टेशनवर सुरू होणार आहे.
RailTel देशभरातील 200 रेल्वे स्टेशनवर कॉमन सर्व्हिस सेंटर किऑस्क उभारत आहे. पहिल्या टप्प्यात, ईशान्य रेल्वेच्या दोन स्टेशनवर, वाराणसी शहर आणि प्रयागराज रामबाग येथे RailWire Sathi Kiosk बसवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात गोरखपूरसह इतर अनेक महत्त्वाच्या स्टेशनमध्ये ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी स्टेशन चिन्हांकित केली जात आहेत. प्रवाशांना RailWire Sathi Kiosk द्वारे आधारसाठी अर्ज करता येईल आणि कर भरण्याची सुविधा देखील मिळेल. यामध्ये प्रवास तिकिटे (ट्रेन, विमान, बस इ.), आधार कार्ड, मतदार कार्ड, मोबाईल फोन रिचार्ज, वीज बिल भरणा, पॅन कार्ड, प्राप्तिकर, बँकिंग, विमा आणि बरेच काही समाविष्ट आहे.
ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, रेलटेलने पायलट प्रोजेक्ट म्हणून दोन स्टेशनवर रेल वायर साथी किऑस्क स्थापित केले आहेत. येत्या काळात अन्य स्टेशनमध्येही ते बसविण्याचे नियोजन आहे. याद्वारे रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरच वीजबिल भरणे, मोबाइल रिचार्ज, आधार आणि पॅन कार्डसाठी फॉर्म भरणे आदी सुविधा मिळणार आहेत.