मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अनेक आश्वासने दिल्यावरही एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी कायम आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ केली, एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली, तरीही अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. त्यामुळे अखेर एसटी महामंडळाने अशा कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.. त्यानंतर आता एसटी महामंडळाने पुढचे मोठे पाऊल उचलले आहे, ते म्हणजे आता नव्याने भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
राज्य सरकार संप मिटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. काही एसटी कर्मचारी संपावर आहेत, तर काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बससेवा ठप्प झाली आहे. त्यात सर्वसामान्यांचे नाहक हाल होत आहेत. त्यामुळे अखेर एसटी महामंडळाने नव्याने कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
एसटी महामंडळाने संपात सहभागी असलेल्या उर्वरित 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. आतापर्यंत 1144 कर्मचाऱ्यांना कामातून बडतर्फ करण्यात आले असून, 11024 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे..
एसटीतून सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूका देण्यात येणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाने जाहिरात काढली आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी काही एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन महिने संप पुकारला आहे. कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.
एकीकडे धुळखात पडलेल्या बस पुन्हा रस्त्यावर उतरवण्यासाठी शासनाला अतिरिक्त खर्चाची तजवीज करावी लागणार आहे. दुसरीकडे, लाल परी रस्त्यावर धावत नसल्याने, सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना संपाचा सर्वाधिक फटका बसत आहे. लालपरी थांबण्याचा सर्वाधिक परिणाम हा मुलींच्या शिक्षणावर पडल्याचे दिसून येत आहे.
बापरे.. आता युरोपियन देशांना मिळालाय धोक्याचा इशारा; ‘त्यासाठी’ चीनच ठरतोय जबाबदार..
युरोपात कोरोनाचे थैमान.. तरीही ‘या’ देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही; जाणून घ्या, काय आहे परिस्थिती ?