मुंबई : एसटी संप मागे घेऊन 13 डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, यासाठी सरकारने अल्टीमेटम दिला होता.. मात्र, सरकारचा अल्टिमेटम धुडकावून लावत एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.. गेल्या 36 दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांचा हा संप सुरु आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारने नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या, काहींचे निलंबन केले, तर रोजंदारी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करुन पाहिली.. मात्र, तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने राज्यातील एसटीचे चाक अद्याप रुतलेलेच आहे.. उलट सरकारच्या या कारवाईमुळे संप चिघळण्याचे चित्र आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी दिलेली १३ डिसेंबरची मुदत संपूनही कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. विलिनीकरणाची प्रमुख मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत कामावर परतणार नाही. कारवाईची तमा आम्ही बाळगत नसून, मागणीवर आजही ठाम असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी कर्मचारी आंदोनलनावर ठाम असल्याने बससेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी संपावर कोणताही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे..
मंत्री परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमला केराची टोपली दाखविताना, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसते. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते, या कर्मचाऱ्यांवर मेस्मानुसार कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 20 डिसेंबरला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. त्यात काय निर्णय होताेय, यावरही राज्याची नजर असणार आहे..
आजची रेसिपी : फुलकोबी चिल्ली कधी खाल्ली आहे का नसेल तर बनवा अशी
Nagar Zp Society : विजय कोरडेंची आणखी एक पोस्ट व्हायरल; कडूस-जोर्वेकरांच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष