Asia Cup 2023 : भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून आपल्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या दुखापतींनी टीम इंडियाला खूप त्रास दिला. यापैकी बुमराह आणि कृष्णाने पुनरागमन केले आहे. दोघांची आयर्लेंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी निवड झाली आहे. त्याच वेळी, केएल राहुलच्या फिटनेसबद्दल एक मोठा अपडेट आला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून आशिया कपमध्ये खेळू शकतो, असे बोलले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल पूर्ण फिटनेस परत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यास तयार आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध लखनौ सुपरजायंट्सकडून खेळताना तो जखमी झाला होता. त्याच्या पायाला दुखापत झाली होती.
दुखापतीमुळे राहुल आयपीएलच्या शेवटच्या काही सामन्यांना मुकला होता. तसेच, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळला नव्हता. वेस्ट इंडिज दौऱ्यावरही तो संघासोबत राहिला नाही. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि पुनरागमन करण्यास तयार आहे. आशिया कप 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. पाकिस्तानचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचे सामने श्रीलंकेतही होणार आहेत. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
राहुलच्या पुनरागमनामुळे भारताच्या एकदिवसीय संघात संतुलन येईल. तो मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज आहे. राहुलने नुकतेच सोशल मीडियावर नेटमध्ये फलंदाजी आणि विकेटकीपिंगचे व्हिडिओ शेअर केले आहेत. बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रशिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञ राहुलच्या प्रकृतीवर समाधानी असल्याचे बोलले जात आहे. तो आशिया चषकासाठी निवडीसाठी उपलब्ध असेल.
श्रेयस अय्यर अजूनही अनफीट
मात्र, श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत कोणतीही चांगली बातमी नाही. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. फीट होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो कधीपर्यंत बरा होईल याचीही माहिती अजून मिळालेली नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतून तो पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता आहे.