मुंबई : आयपीएल क्रिकेट स्पर्धांवर यंदाही कोरोनाचे संकट कायम आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही याबाबत गंभीर आहे. बोर्डाने शनिवारी सर्व फ्रँचायझींबरोबर बैठक घेतली. व्हर्च्युअल बैठकीत या स्पर्धेचे सर्व सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरात आयोजित करण्याचा विचार सुरू आहे आणि या मुद्द्यावर जवळपास सर्वांचे एकमत होत असल्याचे सांगण्यात आले.
वृत्तसंस्था एएनआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आयपीएल 27 मार्चपासून सुरू होऊ शकते. आयपीएल स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करायची असून पहिला सामना मुंबईत होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मुंबई आणि पुण्यातील चार मैदाने एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने तेथे क्रिकेट सामने सहज आयोजित केले जाऊ शकतात. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम व्यतिरिक्त मुंबईचे वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि डीवाय पाटील स्टेडियम येथे सामने होऊ शकतात. यावेळी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मुंबई आणि पुण्यातील सामन्यांसाठी खेळाडूंना विमानतळावर यावे लागणार नाही. ते बसने प्रवास करू शकतात. अशा परिस्थितीत बाहेरील लोकांपासून अंतर राखले जाईल.
कोविड-19 चा त्रास वाढल्यास UAE मध्ये IPL पुन्हा एकदा होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेसाठी बोर्ड तयार नाही. युएईमध्ये दोन मोसमात होणार्या सामन्यांमुळे तेथे बोर्डाला आराम मिळेल. माध्यमांमध्ये पर्याय म्हणून श्रीलंकेचे नाव घेतले जात होते, मात्र बैठकीत त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
याआधी शनिवारी आयपीएलने लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंबाबत अधिकृत घोषणा केली होती. आयपीएलचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून 1214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यापैकी 350 ते 400 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले जाईल. “आयपीएल 2022 लिलावासाठी एकूण 1214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 परदेशी) नोंदणी केली आहे,” असे आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे.
IPL 2022 : आयपीएलसाठी तब्बल 1214 खेळाडू मैदानात..! पहा, किती आहेत भारतीय आणि विदेशी खेळाडू..?