मुंबई- भारताचा दिग्गज सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी फिट झाला आहे.
टी-20 आणि एकदिवसीय मालिकेच्या खेळाडूंच्या निवडीसाठी या आठवड्यातच बैठक होणार आहे. या मालिकेसाठी भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन या भारताच्या दोन अनुभवी खेळाडूंना खराब कामगिरीमुळे संघातून वगळले जाऊ शकते.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा आता संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोलकाता येथे टी-20 सामने होणार आहेत. याआधी 06 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रोहित शर्मा आता वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यासाठी फिट आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यास अजून 10 दिवसांचा अवधी आहे, यादरम्यान त्याला आयसोलेशनमध्येही राहावे लागणार आहे.
रोहित शर्मा आता मुंबईत प्रशिक्षण घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या त्याची फिटनेस चाचणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे होणार असून त्यानंतरच त्याच्या उपलब्धतेची औपचारिक घोषणा केली जाईल. रोहितला कसोटी कर्णधार बनवले जाईल हे जवळपास निश्चित आहे, परंतु बीसीसीआय त्याच्या कामाचा ताण आणि 2022 आणि 2023 मधील दोन बॅक टू बॅक वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी लक्षात घेऊन इतर पर्यायांवर विचार करत आहे. कर्णधार म्हणून केएल राहुलचा पहिला दौरा अपेक्षेप्रमाणे झाला नाही आणि सध्या त्याला रोहितच्या नेतृत्वाखाली खूप काही शिकण्याची संधी मिळणार आहे.
हार्दिक पांड्याही संघात पुनरागमन करू शकतो कारण तो नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे पण तो गोलंदाजीसाठी कितपत तंदुरुस्त आहे हे सांगणे कठीण आहे. या दोन दिग्गजांचे मर्यादित षटकांमध्ये टीम इंडियामध्ये झटपट पुनरागमन करण्यासाठी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड वाट पाहत असेल. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडसाठी दक्षिण आफ्रिका दौरा अजिबात चांगला नव्हता.