Environmental News: अहमदनगर (Ahmednagar): Single Use Plastic Ban: पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने देशामध्ये प्लास्टिक बंदीसाठी (Plastic Ban) केंद्र सरकारने आता गंभीर पावले उचलली आहेत. (Central Government) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) एकेरी वापराच्या प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी घातली असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा नियम लागू आहे. कोणी सिंगल-युज प्लास्टिक विकले किंवा या प्लास्टिकचा वापर करत असेल तर त्याच्यावर महापालिकेकडून (Ahmednagar Municipal Corporation) दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नगरमध्ये विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्या माध्यमातून मात्र गेल्या पाच वर्षापासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरा विरोधात जनजागृतीची मोहीम चालविली जात आहे. यासाठी प्रतिभा धूत यांच्या पुढाकारातून ५ हजार कापडी पिशव्या (A cloth bag) गरजू महिलांकडून शिवून घेतल्या आहेत. या उपक्रमांतर्गत नगर शहरात विविध ठिकाणी भाजी बाजारात जाऊन समितीचे सदस्य जनजागृती करत आहेत. भाजी विक्रेत्यांना ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या न देता कापडी पिशव्या द्या अशी विनंती करून केवळ ५ रुपयाला कापडी पिशव्या दिल्या जात आहेत. समितीचे सदस्य प्रत्येक भाजीविक्रेत्याला आणि नागरिकांना प्लास्टिक पिशव्या वापरू नका, प्लास्टिक कचरा वाढवू नका असे समजावून सांगत आहेत.
कापडी ‘पिशवी हाच पर्याय… निसर्गाला देई न्याय’… असे जनजागृतीचे फलक यावेळी भाजीविक्रेत्यांना समितीच्या वतीने देण्यात आले. सामाजिक माध्यमाद्वारे प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात जनजागृती व्हावी यासाठी समितीच्या सदस्यांनी गाण्याचा व्हिडीओ बनवून युट्युबवर व्हायरल केला आहे. बाजारात जाताना न्या कापडी पिशवी : किराणा सामान आणण्यासाठी अथवा भाजीपाल्यासाठी आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा बहुतांशीवेळा सोबत पिशवी नेत नाही. कॅरीबॅग अथवा प्लास्टिक पिशवी देण्याचा आपण दुकानदारांना आग्रह करतो. आता मात्र शासनानेच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याने घराबाहेर पडतानाच हातात कापडी पिशवी नेण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे. बाजारात कुठेही अगदी पाच ते दहा रुपयाला चांगली टिकाऊ कापडी पिशवी सहज उपलब्ध होते.