Earthquake in Maharashtra: नाशिक: महाराष्ट्रात दि. 22 नोव्हेंबर, 2022 रोजी रात्री 09.00 ते 09.30 दरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांना हादरा बसल्याबाबतच्या तक्रारी आहेत. मात्र, याबाबत भूकंपमापन केंद्र (मेरी, नाशिक) येथे अशी कोणतीही भूकंपाची नोंद झाली नसल्याचे अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अशा अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन करण्यात आलेले आहे.
तसेच प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजी खूप आवश्यक आहे. भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत दक्षता घेणे. भूकंप का होतो त्याची कारणे व होणा-या परीणामांबाबत चर्चा करा. घराची नियमित पहाणी करुन दुरुस्ती करणे जरुरीचे आहे, भिंतींना तडे गेले असतील तर ते बुजविणे व भिंतींची मजबुती करणे आवश्यक आहे. लोडबेअरींग घर बांधताना प्रत्येक खोलीच्या चारही कोप-यांचे मजबुतीकरण करण्यासाठी सलोह कॉक्रीट वापरणे व त्याची प्लींथ, लिंटल व रुफ बँडमध्ये सांधणी करणे आवश्यक आहे. आपल्या घरातील, कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक इमारतींमधील सुरक्षीत बाहेर पडण्याचे मार्ग जाणून व समजून घ्या. अवजड आणि मोठया वस्तु शक्यतो जमिनीलगत ठेवा, उंच जागेवर ठेऊ नका. घरातील कपाटे, अवजड फ्रेम्स भिंतीवर व्यवस्थी लावाव्यात.
भूकंपा दरम्यान काय करावे : स्वत: शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. जर तुम्ही घरात, इमारतीच्या आत असाल, टेबलाखाली अथवा पलंगाखाली बसून स्वत:चा बचाव करा. कॉलमजवळ, दरवाज्याजवळ, चौकटीखाली उभे राहुन स्वत:चा बचाव करा. लिफ्टचा वापर करु नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करु नका. भिंती, आरसे, फर्निचर, कंदील यांचेपासून लांब रहा. शक्यतो चादर, उशी अथवा कपडयाची घडी डोक्यावर घ्या, जेणेकरुन इजा होणार नाही. जर, तुम्ही रस्याकावर असाल तर पटकन मोकळया जागेत जा, घाई गडबड करु नका. रस्याेणच्या कडेने जात असाल तर उंच जुन्या आणि सलग असणा-या इमारतीपासून लांब रहा. भिंती, वीजेच्या तारा आणि अंगावर पडण्याची शक्यता असेल अशा वस्तूंपासुन दूर रहा. जर, तुम्ही गाडी चालवत असाल तर जुन्या इमारती, भिंती, इलेक्ट्रीक वायर, केबल व उंचवटा यापासून आपले वाहन दूर नेऊन थांबवा.
भूकंपानंतर काय करावे : शांत रहा, रेडीओ, टिव्हीद्वारे मिळणा-या सूचना काळजीपूर्वक ऐका व त्यांचे पालन करा. भूकंपानंतर अनेक अफवा उठतात उदा. जमिनीला भेगा पडल्या इत्यादी खात्री शिवाय अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. अफवा पसरवू नका. भुकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर छोटे धक्के बसू शकतात. त्यामुळे पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा. काडी ओढू नका. विजेचे बटन लगेचच चालू करु नका, कारण गॅस गळती अथवा शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता असते. जर काही व्यक्ती जमिनीखाली बदल्या गेल्या असतील तर मदत तुकडीशी संपर्क साधावा. दुषीत, उघडयावरचे पाणी पिणे टाळा, जेणेकरुन रोगांना प्रतिबंध होईल. भुकंपाच्या धक्क्यांमुळे ज्या घरांना,इमारतींना फार मोठे तडे गेले आहेत त्या इमारतींचा राहण्यासाठी वापर करु नये.