Congress First List : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Lok Sabha Election) केव्हाही जाहीर होऊ शकते. अशात राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. भाजपनंतर काँग्रेसने (Congress First List) काल 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत राहुल गांधी, शशी थरूर (Shashi Tharoor), केसी वेणुगोपाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य ताम्रध्वज साहू अशा दिग्गजांना उमेदवारी दिली आहे. या नेत्यांना लोकसभेचे तिकीट देऊन स्पष्ट संदेश दिला आहे की यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ आणि दिग्गज मंडळींनाही निवडणूक लढवावी लागेल.
काँग्रेसने शुक्रवारी सायंकाळी 8 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 39 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात दिसतील. तसेच शशी थरूर तिरुवनंतपूरम, भूपेश बघेल राजनांदगाव, ताम्रध्वज साहू महासमुंद, ज्योत्स्ना महंत कोरबा, डीके सुरेश यांना बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आणि ताम्रध्वज साहू यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर स्पष्ट होत आहे की काँग्रेस नेतृत्वाने तिकीट देताना विजयी होण्याची जास्त खात्री असलेल्याच उमेदवारांचा विचार केला आहे. 2024 च्या निवडणुकीची लढाई आता केवळ निवडणूक नाही तर काँग्रेससाठी स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याची आहे.
Congress First List
काँग्रेस भाजपला आव्हान देताना दिसेल ही काळजी पक्षाकडून घेतली जात आहे. यासाठी तिकीट देताना राजकीय ताकदवान नेत्याचाच विचार केला जात आहे. यासाठी काँग्रेसने राज्यात आणि देश पातळीवरील दिग्गज नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
काँग्रेसने ज्या पद्धतीने दिग्गज नेत्यांना उमेदवारी दिली आहे त्यावरुन दिसत आहे की कमलनाथ, दिग्विजय सिंह ते जितू पटवारी या नेत्यांवर दबाव वाढला आहे. राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर जोधपूर तर माजी विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी जयपूर ग्रामीण मतदारसंघातून लढावे यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून दबाव टाकला जात आहे. इतकेच नाही तर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनाही निवडणूक लढण्यास सांगितले जात आहे.
हरियाणाचा विचार केला तर विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा पुढील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. तर दुसरीकडे पक्ष नेतृत्व त्यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांना रोहतकमधून तिकीट देण्याची शक्यता आहे. तसेच रणदीप सिंग सुरजेवाला, कुमारी शैलजा, किरण चौधरी यांनाही गळ घातली जाण्याची शक्यता आहे.
Congress First List
महाराष्ट्राचा विचार केला तर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही तिकीट दिले जाऊ शकते.
काँग्रेसंच प्लॅनिंग नेमकं काय?
आताच्या लोकसभा निवडणुका काँग्रेससाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. यासाठीच काँग्रेस जोरदार तयारी करत आहे. कोणतीही कमकरता राहू नये यासाठी नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. यावेळी सुद्धा 50 च्या आसपास जागा मिळाल्या तर नंतर कमबॅक करणे कठीण होणार आहे. राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यांतील दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणे हा निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याच्या प्लॅनिंगचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे. या नेत्यांना उमेदवारी दिली तर त्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असे पक्षाला वाटते.
Congress First List
या निवडणुकीच्या मैदानात घाम गाळल्याशिवाय वरिष्ठ नेत्यांन महत्वाच्या राजकीय भूमिका देण्याच्या मनस्थितीत पक्ष नेतृत्व नाही. कारण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जा मिळण्याइतपतही जागा मिळाल्या नव्हत्या. अशा स्थितीत आता पक्षाला ज्येष्ठ नेत्यांना तिकीट देऊन जास्त जागा जिंकायच्या आहेत. दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्या मतदारसंघांसह आसपासच्या मतदारसंघांवरही राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. बड्या नेत्यांना मागच्या दाराने प्रवेश मिळणार नसून त्यांना निवडणूक लढवावीच लागेल असा संदेश काँग्रेसच्या पहिल्या यादीतून दिला गेला आहे.