मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि T20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय मालिका आधी 6 शहरांमध्ये होणार होती, परंतु BCCI ने कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता वेळापत्रकात बदल केला आहे. आता एकदिवसीय मालिका एका शहरात तर टी-20 मालिका दुसऱ्या शहरात होणार आहे.
अधिकृत निवेदन जारी करताना बीसीसीआयने म्हटले आहे, की भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका अहमदाबाद येथे तर तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका कोलकाता शहरात होईल. याआधी एकदिवसीय मालिकेचे सामने अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता येथे होणार होते आणि टी-20 मालिका कटक, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे होणार होती.
बीसीसीआयने म्हटले आहे, की मूळ घोषणा केल्याप्रमाणे मालिका सहाऐवजी दोन ठिकाणी मर्यादित ठेवण्याच्या निर्णय जोखीम कमी करण्यासाठी घेतला गेला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना रविवार 6 फेब्रुवारी रोजी, दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना बुधवार 9 फेब्रुवारी रोजी, तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. त्याचवेळी T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी 16 फेब्रुवारी रोजी, दुसरा सामना शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी आणि शेवटचा सामना रविवार 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता शहरातील मैदानावर होणार आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाचा पराभव केला आहे. त्यानंतर आता वेस्ट इंडिज विरोधात संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोरोनाचा वेस्ट इंडिज दौऱ्याला झटका; फक्त ‘या’ दोन शहरांतच होणार सामने; BCCI निर्णय घेण्याच्या तयारीत