दिल्ली : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता समाजवादी पार्टीने मोठी घोषणा केली आहे. युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी जोरदार आवाज उठवणार आहे, असे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी सांगितले. तसेच ज्या भरती बाकी राहिल्या आहेत त्या रिक्त जागा भरतीसाठी पक्ष संघर्ष करणार असल्याचे स्पष्ट करत भाजपला युवकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.
अखिलेश यादव यांनी दावा केला की, 34 लाखांहून अधिक उमेदवार भरती पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. निवेदन स्वीकारल्यानंतर लखनऊ येथील पक्ष कार्यालयात सरकारी भरतीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांच्या शिष्टमंडळाला यादव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भाजप सरकारने उमेदवारांना दिलेली असंवेदनशील वागणूक अन्यायकारक आहे. त्यांनी युवकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये.
भाजप सरकारने लाखो नोकऱ्या देण्याच्या खोट्या जाहिराती करून युवकांना फसवण्याचे काम केले आहे. ‘उत्तर प्रदेशात ना गुंतवणूक येत आहे, ना उद्योग, मग रोजगार कसे आणि कुठे मिळणार ? भाजप फक्त खोटेपणा आणि फसवणुकीचे राजकारण करत आहे. गरिबांचे रोजगार हिसकावून भांडवलदारांची तिजोरी भरण्याचे काम भाजप करत आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यानही यादव यांनी तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला घेरले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, जर समाजवादी पार्टी सरकार स्थापन झाले तर राज्यात रिक्त असलेली 11 लाख पदे भरली जातील. त्याचवेळी भाजपने गेल्या 5 वर्षांत सुमारे 5 लाख तरुणांना सरकारी रोजगार देण्याबरोबरच कोट्यवधी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे म्हटले होते.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्यनाथ यांनी राज्य सरकारच्या विविध विभागांना येत्या 100 दिवसांत 10,000 तरुणांना सरकारी रोजगार देण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर विभागांनी आपले काम सुरू केले आहे. निवडणुकीत भाजप आघाडीला 273 तर सपा आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत.
बेभरवशाचे राजकारण..! अखिलेश यादव यांच्या अडचणी वाढणार; भाजपने तयार केलाय ‘हा’ खास प्लान..