मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-
जम्मू-कश्मीरमधील निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात कोरोना संक्रमण आणि प्रचंड थंडी असूनही तरुण, वृद्ध, स्त्रीया मतदान करण्यासाठी बूथपर्यंत पोहोचल्या. लोकशाही मजबूत करण्यासाठी जम्मू-कश्मीरच्या जनतेचे आभार मानतो, असे पंतप्रधान म्हणतात. पण त्याच थंडीवाऱयात पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एक महिन्यापासून बसला आहे. ते शेतकरी लोकशाही स्वातंत्र्याचे मारेकरी आहेत, असा चिखल मोदी सरकारने उडविला आहे. सरकारविरोधात कोणी बोलत असतील म्हणून त्यांची गळचेपी करणे किंवा अशा लोकांशी संवाद तोडणे म्हणजे लोकशाही नव्हे. पंतप्रधान मोदी हे देशाच्या लोकशाहीचे रखवालदार आहेत. त्यांच्या भाषेत ते प्रधानसेवक किंवा चौकीदार आहेत. सरकारने शेतकऱयांसाठी अनेक योजना जाहीर केल्या, त्या चांगल्याच आहेत. शेतकऱयांच्या खात्यात काल 18 हजार कोटी जमा केले. तरीही दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी असंतुष्ट असेल तर त्याची वेदना वेगळी आहे. खरे सांगायचे तर आपल्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांची जखमही माहीत आहे आणि उपचारही माहीत आहे, पण मोदी यांची तऱहा अशी की, दुखणे पोटाला व प्लास्टर पायाला. सरकार किंवा राजा करतो, ते सर्व बरोबर या भूमिकेत आजचे सरकार आहे, याला अर्थ नाही. सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळय़ा झाल्या आहेत. शेळय़ा झालेले एकमेकांना सांगत आहेत की, ‘मेंढपाळाने छान व्यवस्था केली.’
ही व्यवस्था म्हणजेच
आनंद, सुख मानण्याची गोष्ट नाही. सरकारला शेळय़ांची व्यवस्था करायची आहे व त्या व्यवस्थेवर शेळ्या खूश असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण इतरांनीही शेळ्या-मेंढ्या व्हावं हा त्यांचा आग्रह चुकीचा आहे. वाघ, लांडगे, हत्ती, सिंह यांनीही शेळ्या-मेंढ्यांसारखे बॅss बॅss करावे व कोणी गर्जना केली तर तो अपमान, ही लोकशाही नाही. यालाच लोकशाही म्हणावे, असा दबाव टाकणाऱयांना लोकशाही शिकवायची गरज आहे. पंतप्रधान जम्मू-कश्मिरातील जिल्हा विकास परिषद निवडणुकांवर बोलतात, पण लडाखमध्ये घुसलेल्या चिनी सैन्यावर बोलत नाहीत. विरोधकांनी घुसखोर चिनी सैन्याचा विषय काढला की, त्यांना तो अपमान किंवा टोमणे वाटतात. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांना कोण कशाला टोमणे मारतील? त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांचे राज्य बहुमतावर सुरू आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभाग हे त्यांच्या बहुमताचे रखवालदार आहेत, तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे टोमणे वगैरेची चिंता का करता? मोदी हे जागतिक स्तरावरील मोठे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मारलेल्या टोमण्यांची दखल घेण्याची त्यांना गरज नाही. राहुल गांधी यांना गेल्या सहा वर्षांत या मंडळींनी मारलेले टोमणे एकत्र केले तर मोठे ग्रंथ निर्माण होतील. राहुल गांधींचा उल्लेख ‘पप्पू’ असा करणाऱ्यांनी दुसऱ्यांनी मारलेल्या टोमण्यांची धास्ती का बाळगावी? पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा वापर सध्या सुरू आहे, त्यास काय म्हणावे? शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवरही अधूनमधून टोमणेबाजी सुरूच असते. राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱयांनी याची तयारी ठेवायलाच हवी. मोदी सरकारचे भाग्य असे की, आज विरोधी बाकावर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळय़ांवर राज्य करणे सोपे असते.
संपादन : स्वप्नील पवार
- म्हणून सुरू झाले भावनांचे ‘तांडव’; UP पोलिसांची टीम मुंबईत दाखल
- कोट्यावधी रुपयांचे मालक असलेले ‘हे’ 5 क्रिकेटर्स आहेत फक्त 10 वी किंवा 12 वी पास; इतर नावे वाचून व्हाल शॉक
- ना भाजप, ना महाविकास आघाडी; ‘या’ मंत्र्यांच्या पॅनलने सगळ्यांनाच चारली धूळ
- आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत ‘या’ माजी उपमुख्यमंत्र्यांना धक्का; बारामतीकरांचे बारीक लक्ष भोवणार
- तृतीयपंथी असल्याने अर्ज नाकारलेल्या अंजली पाटलांचा निकाल आला समोर; वाचा, काय आहे निकाल