मुंबई :
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे मराठा आरक्षण हा सध्या ट्रेंडमधील विषय आहे. मराठा आरक्षणावरून सध्या अनेक राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत. अशातच राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व खासदारांना पत्र लिहित आपली भूमिका मांडली आहे. सर्वपक्षीय खासदारांनी आपापसातील मतभेद विसरून मराठा आरक्षणाच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी आहे, असे म्हटले आहे.
‘आपण सर्व जण मराठा आरक्षण प्रश्नांविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू सुद्धा झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे’, असे संभाजीराजे यांनी सर्व खासदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती मध्ये स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशा प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे.
दरम्यान त्यांनी या पत्रात एक मागणीही केली आहे. त्यांनी म्हटले की, केंद्राने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण दिले आहे. ते देखील न्यायालयात आले आहे. परंतु, केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे.
आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33 टक्केच्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आवाहनही त्यांनी केले.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी